उमरठ मध्ये गणरायाला वाजत-गाजत निरोप
प्रतिनिधी सिताराम कळंबे
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला. डीजेच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गौरी गणपतींना आज गुरूवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ च्या जयजयकारात लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी वरूणराजाची कृपा पहावयास मिळाली.
उमरठ मध्ये गणेशचतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाचे घरोघरी आगमन झाल्यानंतर पाच दिवस भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात आली. या कालावधीत अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दररोज आरती, भजन, जाखडी, महिलांचे टिपरी नृत्य असे कार्यक्रम झाले. यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. घरोघरी आरत्यांचे सूर घुमत होते. पाच दिवस गणरायाची भक्तीभावाने सेवा करण्यात आल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजेच गुरूवारी लाडक्या बाप्पाला गौरीसह जड अंतकरणाने निरोप देण्यात आला.
गुरूवारी विसर्जन दिवशी अनेक ठिकाणी दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांच्या गजरात बेंजोच्या तालावर नाचत वाजत-गाजत लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. विसर्जनस्थळी मिरवणुका आल्यानंतर बाप्पाची आरती करण्यात आली. यानंतर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला.