सुनिल तटकरे प्रचंड लोभी; कपडे बदलतात तशी विचारधारा बदलत आहेत : रविंद्र चव्हाण
राज्यात वंचित बहुजन आघाडीचा ११ जागांवर विजय होईल यात रायगडच्या जागेचा समावेश : अंजली ताई आंबेडकर
महाड संदिप जाबडे
रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आज अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही तांत्रिक कारणात्सव अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. परंतु अंजली ताई आंबेडकर उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नव संजीवनी पाहायला मिळाली. ४०° सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानात देखील शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेस उपस्थिती लावली.
सुनिल तटकरे हे खुप लोभी आहेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी सुनिल तटकरे हे भाजपा सोबत गेले. स्वतःच्या मुलीला मंत्री बनविण्यासाठी स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे मंत्रिपद थांबवून ठेवले. सुनिल तटकरेंचा इतिहास आहे ज्यांनी त्यांना मदत केली अशा शेकाप, मा. मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले, मा. आमदार माणिकराव जगताप यांच्या पाठीत तटकरे साहेबांनी खंजीर खुपसला असा आरोप देखील यावेळी जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हे तटकरे निवडून आले की आपल्यासाठी नवीन खंजीर तयार आहे ही भीती शिवसेनेच्या आमदारांच्या मनात असल्याचे धक्कादायक वक्तव्य यावेळी त्यांनी केले.
रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी कोंकणातील समस्यांची अचूक मांडणी करीत, कोंकणातील प्रश्न सोडविण्यासाठी ह्या जिजाऊंच्या लेकीला आपण दिल्लीला पाठवा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे माझे ध्येय असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्थलांतर कमी करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण मला मदत करा असे आवाहन यावेळी कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारांना केला. अनंत गीतेंवर निशाणा साधित तीस वर्ष लोकप्रतिनिधी असूनही एकही काम आणू शकले नाहीत, हे उद्योगधंदे इथे आणण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले. महिलांचे प्रश्न जातीने सोडविले जातील, रायगड लोकसभा मतदार संघात महिला खासदार नसून पाहिल्या एक महिला लोकसभेची उमेदवार म्हणून महिला मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी असल्याचं दावा केला.
यावेळी वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी महाडच्या सभेत साधला भाजपा व काँग्रेसवर निशाणा साधला. तुम्ही कितीही भ्रष्टाचारी असा, तुम्ही कितीही पैसे लाटा, भाजपाच्या गंगेत डुबकी मारलीत कि तुमचे गुन्हे माफ असा टोला भारतीय जनता पार्टी ला लगावला. तुम्ही कितीही जातीयवादी असा, तुम्ही कितीही मुस्लिम विरोधी असा, तुम्ही कितीही हिंदुत्ववादी असा, कॉग्रेसच्या गंगेत डुबकी मारलीत कि तुम्ही सेक्युलर असे म्हणत विरोधकांना फटकारले.
यावेळी राष्ट्रीय नेत्या अंजली प्रकाश आंबेडकर,महाराष्ट्र राज्य प्रवक्ता प्रियदर्शी तेलंग, राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण,युवक जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड, जिल्हा महासचिव सागर भालेराव, महासचिव श्रीहर्ष कांबळे,उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, महासचिव वैभव केदारी, महिला अध्यक्षा मोहिनी शिर्के, मराठा महासंघ राज्य अध्यक्ष संदिप सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.